हिंदू विवाह

हिंदू विवाह

हिंदू विवाह  हा हिंदूंचा एक संस्कार वा सोहळा आहे. ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. हिंदू धर्मात विवाहास सोळा संस्कारांतील एक संस्कार मानतात. पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः हिंदू लग्न या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्‍नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्‍नींदरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून  ध्रुव ताऱ्यास साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्‍नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे.
हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्‍नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे. विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार !

संसार रूप शकटाप्रति वाहणारी,

चक्रेच दोन असती नर आणि नारी
यायास की सहचरत्व त्या द्वयास,
आहे विवाहविधी जणू एक आस ....... 
असे या विधीचे काव्यात्म वर्णन केले आहे. विवाहाला पाणिग्रहण, उपयम, परिणय, उद्वाह अशीही नावे आहेत. पाणिग्रहण ,म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात आपल्या हाती घेणे. उपयम म्हणजे वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे. परिणय म्हणजे वधूचा हात हाती घेवून अग्नीला प्रदक्षिणा घालणे. उद्वाह म्हणजे वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे. मानवी समाजातील ही सर्वात प्राचीन संस्था मानली जाते.विवाह ही केवळ कुटुंबातील महत्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे. धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती असे विवाहाचे दोन उद्देश मानले जातात.

विधीसंपादन करा

  • विवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला करतात.
  • लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते.
  • हिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदू लग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत.
  • या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती, मंगलाष्टके असे विधी होतात. *त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, कानपिळी, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, वधूने गौरीहार पूजणे असे लौकिक विधीही केले जातात.



संपादन करा

सप्तपदीसंपादन करा

सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्घ्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधू-वर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. ईशान्य दिशेकडे संपणारी सप्तपदी मांडली जाते. ईशान्य ही अपराजिता दिशा मानली असल्याने वधूनेही त्या दिशेने जाण्याचा संकेत रूढ आहे.
अन्नलाभासाठी पहिले, ऊर्जेसाठी दुसरे, समृद्धीसाठी तिसरे, सुखसमृद्धीसाठी चौथे, उत्तम संततीसाठी पाचवे, विविध ऋतूंच्या सुखासाठी सहावे आणि मैत्रीच्या सहृदय नात्यासाठी वधू-वर एकत्रपणे सातवे पाऊल चालतात. याला सप्तपदी असे म्हणतात.
सप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.
वरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्‌वासन ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.
(विकिपीडिया मधून..)

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन